Monday, November 23, 2009

बबनराव, ‘मोह’ आणि हर्बल लिकर!

लोकसत्ता २१ नोव्हेम्बर

बबनराव, ‘मोह’ आणि हर्बल लिकर!


किशोर जामदार, नागपूर, २१ नोव्हेंबर
९४२१७१८४८५
माननीय बबनराव पाचपुते यांस,
स.न.वि.वि.
आपण नाशिक मुक्कामी केलेले ‘हर्बल लिकर’च्या संदर्भातील वक्तव्य ‘लोकसत्ता’मुळे कळले. आदिवासी विकास मंत्रालयाचा कारभार हाती घेताच (कदाचित तत्पूर्वीच) आपण आदिवासींच्या विकासाच्या योजनांवर अभ्यासपूर्ण चिंतन करीत असल्याचे जाणवले. जंगलात कोणती झाडे किती उपलब्ध आहेत? त्यापासून काय उत्पादन होऊ शकते? याचा इतका तपशीलवार विचार आजवर कुणी केल्याचे ज्ञात नाही. तेव्हा आपल्या या पुढाकाराबद्दल शतश: धन्यवाद! मोहापासून ‘हर्बल लिकर’ बनविण्याच्या आपल्या कल्पकतेबद्दल आपले अभिनंदन! या हर्बल लिकरच्या माध्यमातून आदिवासींचा विकास साधण्याच्या आपल्या या योजनेबद्दल काही प्रश्न डोके वर काढत आहेत, म्हणून हा पत्रप्रपंच!.
पहिला आणि मूळ प्रश्न म्हणजे, आदिवासींचा विकास म्हणजे आपणांस काय अपेक्षित आहे? दुसरा प्रश्न, असा की केवळ ‘हर्बल लिकर’ च्या मुक्त आणि मोठय़ा प्रमााणावरील उत्पादनामुळेच हा विकास शक्य आहे, असे आपणांसच नव्हे तर अनेक शासनकर्त्यांना कां वाटते? हे प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, आजवर ज्या मागास भागांच्या विकासाच्या घोषित उद्देशाने त्या भागात मोठे उद्योग सुरू करण्यात आले. त्यात त्या भागातील स्थानिक लोकांच्या वाटय़ाला विस्थापन, बकालपण आणि उपरेपणाच आलेले आहे. मग ती आमच्या आदिवासी जिल्ह्य़ातील पेपर मिल असो, सिमेंट कारखाने असोत, कोळसा खाणी असोत वा विद्युत कारखाने असोत. या सर्वात उखळ पांढरं झालं ते देशोदेशींच्या धनदांडग्याचे, त्यांच्या दलालांचे आणि राजकारण्याचे. मधू कोडा हे असल्या आदिवासी विकासाचे ‘लेटेस्ट मॉडेल आहेत.’ आणि ज्यांच्या विकासाचा उदात्त विचार आपण करता आहात ते मात्र अशा सर्व उद्योगांमुळे नागवलेच गेले आहेत. हा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे.
‘मोहा’बद्दल बोलायचे तर अनेक शहरी आणि सुशिक्षित लोकांचा असा ठाम विश्वास आहे की, ‘मोह’ (ते फळ आहे की फूल हे देखील त्यांना माहीत नसते.) ही नशा आणणारी वस्तू आहे. त्यामुळे मोहापासून दारू हे एकमेव उत्पादन शक्य आहे. आपणा सारखा माळकरीही मोहाचा विचार दारूच्याच संदर्भात करतो, यावरून हा ग्रह अधोरेखितच होतो. वस्तुस्थिती यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.
दारू तयार होणारे कुठलेही फळ किंवा फूल किंवा इतर कुठलाही पदार्थ हा मुळात नशा निर्माण करणार नसतो, तसेच मोहाचे आहे. मोहाच्या फुलांना एक गोड उग्र दर्प असतो. चवीलाही ती गोड असतात. त्यामुळे केवळ आदिवासीच नव्हे तर वनांशेजारी राहणारे इतरही लोक त्याचा साखर किंवा गुळाचा पर्याय म्हणून वापर करतात. मोहापासून अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. पुरणाच्या पोळी पासून ते मुरमुऱ्याच्या लाडवापर्यंत अनेक पदार्थात जंगलातील आणि जंगला शेजारी राहणारे लोक मोहाचा वापर करीत असतात. मोहाच्या बी (टोळी)चे तेल काढून त्याचा वापर आमच्या आदिवासी भागात खाद्यतेल व औषधी म्हणून केला जातो.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल लोक (बहुतांश आदिवासी याच श्रेणीत मोडतात) मोहाला बार येतो त्या काळात रोज सकाळी उठून जंगलात जाऊन मोहाची फुले गोळा करतात. ती वाळवून ठेवतात आणि वर्षभर त्याचा खाद्यपदार्थ म्हणून वापर करतात. आपल्या योजनेप्रमाणे ‘हर्बल लिकर’ चे कारखाने सुरू झाले की, ही विनामूल्य मिळणारी साखर आदिवासींच्या हातून निसटून जाईल आणि त्यांना आपल्या पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी उत्पादित केलेली आस्मानी भावाची साखर घ्यावी लागेल. या कारखान्यांसाठी मोह वेचून आदिवासींचा विकास होईल, असा आपला विश्वास असल्यास माफ करा पण, आपणांस आठवण करून द्यावी लागेल की, बिडी कारखान्यांसाठी तेंदूपाने खुडणारे आणि पेपर मिलसाठी बांबू कापणारे हात देखील याच आदिवासींचे आहे पण, स्वातंत्र्याच्या षष्टय़ब्दीपूर्तीनंतरही आदिवासी अध्र्या धोतरातच आहेत. तर बिडी कारखानदार विमाने उडवत आहेत आणि पेपर मिलवाले पंचतारांकित आयुष्य जगत आहेत. तेव्हा बबनराव, या ‘हर्बल लिकर’ ने आपण कोणाच विकास करू इच्छिता?
आमच्या भागात ‘अदानी पॉवर’ ला हिरव्यागार जंगलाची जमीन कोळसा खाणीकरिता देण्याचा घाट घातला गेला तेव्हा आपणच वनमंत्री होतात. ऊर्जा निर्मिती ही सर्वोच्च प्राथमिकता आहे म्हणून त्याकरिता शेकडो वर्षाचे जंगल कापायला आपण तयार झाला असे या संदर्भात सांगितले गेले पण, आमच्या भागातील मेंढा (लेखा) हे आदिवासी गाव याच मोहाच्या टोळीच्या ढेपेपासून बायोगॅस तयार करून त्याद्वारे विद्युत निर्मिती करण्याचा घाट घालत आहे. त्या प्रयत्नांना आपण हातभार लावलात आणि तसे प्रश्नेत्साहन इतर सर्व गावांना दिलेत तर प्रत्येक गाव ऊर्जे संदर्भात स्वयंपूर्ण होईल. म्हणजे एकाच दगडात ऊर्जा, आदिवासी विकास व पर्यावरण संवर्धन, असे तीन पक्षी मारता येतील पण, ज्यापासून करोडो नफा निर्माण होत नाही. अशा उद्योगात आपणासह सर्व शासनकर्त्यांना रस नसावा असे वाटते.
माळकरी असल्याने आपला दारूशी दुरान्वयानेही संबंध नाही, असे आपण म्हणता. इतकी वर्ष राजकारणात राहून देखील दारू, सिगरेट, विडीकाडी यास स्पर्शही केलेला नाही, असे आपण मोठय़ा अभिमानाने सांगता पण, बबनराव, ‘माळकऱ्यानं स्वत: दारूला स्पर्शही करू नये, परंतु दारू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यास काहीही हरकत नाही’, असे का तुमचा पांडुरंग सांगतो?
आपल्याच सरकारने (केंद्रातील सरकार आपलेच आहे ना?) २००६ साली अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी), (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६, अशा नावाचा एक कायदा १८ डिसेंबर २००६ रोजी संमत केला आहे. हे आपणास ज्ञात असेलच. वनाधारित जीवन जगणाऱ्या समाजावर झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करण्याकरिताच या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, असे कायद्याच्या उद्देशाबद्दल नमूद करण्यात आले आहे. या कायद्याची अंमलबजावणी योग्य रितीने झाल्यास आदिवासींना त्याचा शाश्वत विकास साधण्याकरिता जंगलाचे सामूहिक स्वामित्व हक्क मिळू शकेल. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या आदिवासी विकास खात्याकडे तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये आपल्याकडे असलेल्या वन खात्याकडे सामूहिकपणे आहे. पण हा कायदा अमलात आणायचा म्हणजे गेली अनेक वर्षे आपल्या ताब्यात असलेले जंगल लोकांना सोपवून द्यायचे. बाजार अर्थव्यवस्थेत जंगलाचे ‘रक्षण’ करताना मिळणाऱ्या ‘मलई’वर पाणी सोडायचे हे म्हणजे आपलेच वस्त्रहरण आपणच करणे होय, त्यामुळे गेल्या अडीच वर्षात नोकरशाहीने एकदिलाने या कायद्याचा अपप्रचारच केला.
यातील लोकांना खरे अधिकार प्राप्त करून देणाऱ्या म्हणजे वन उपजांवर स्वामित्व हक्क प्राप्त करून देणाऱ्या सामूहिक दाव्यांच्या तरतुदीची माहिती न देता केवळ पट्टे मिळविण्यासारख्या व्यक्तिगत दाव्यांबद्दलच अधिक प्रचार करण्यात आला. तेव्हा पाचपुते साहेब, ‘हर्बल लिकर’ चे उद्योग उभे करण्यापेक्षा आपल्या अखत्यारित असलेल्या खात्यांचे हे उफराटे उद्योग बंद करू शकला तर आदिवासींचा शाश्वत विकास होऊ शकेल.
आपला नम्र
किशोर जामदार

मोह दारु गाळण्यापेक्षाही आरोग्यासाठी अधिक गुणकारी !

लोकसत्ता २१ नोव्हेम्बर

मोह दारु गाळण्यापेक्षाही आरोग्यासाठी अधिक गुणकारी !

नाशिक, २१ नोव्हेंबर / विशेष प्रतिनिधी
पंढरीचे सेवेकरी ह.भ.प बबनराव पाचपुते मंत्री म्हणून आदिवासी विकास खात्याचा कारभार सांभाळते झाल्यावर त्यांना ‘मोह’ अनावर झाला अन् त्याच भरात काही जुजबी कल्याणकारी योजनांसोबत मोहाच्या फुलापासून दारु (हर्बल लीकर) तयार करण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भातही ते बोलते झाले. वास्तवत: मोहाची फुलं जेवढी म्हणून दारुसाठी उपयुक्त असल्याचे भासविले जाते, त्याहून काही पटीने ती आरोग्यासाठी गुणकारी आहेत. त्यामुळेच या फुलांचा अन् ती गळून पडल्यावर टोळंबी नामक फळांचा आदिवासी समाज पोषक आहार म्हणूनही वापर करतो या उपयुक्ततेकडे मात्र मंत्रिमहोदय सोयिस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत, अशी टीका आदिवासी कार्यकर्त्यांकडून होवू लागली आहे.
आदिवासी पट्टय़ात मोहाचे झाड वा फुलं यासाठी महु हा शब्द प्रचलित आहे. मोह फुलांचा बहर ओसरल्यावर त्याच कळीतून टोळंबी नामक फळ आकाराला येवू लागते. हे झाड सुमारे दहा-पंधरा वर्षांचे झाल्यानंतर त्याला फुलांचा बहर यायला सुरुवात होते. साधारणत: मार्च महिन्यात या झाडाची पाने परिपक्व होवून गळून पडतात. नंतर झाडांच्या फाद्यांवरील कळ्या हळूहळू कोंब फुटून वाढायला लागतात. त्यांची वाढ सुमारे पंधरवडय़ात पूर्ण होताच त्यांचे मोह फुलात रुपांतर होते. त्यानंतरच्या पंधरवडा-तीन आठवडय़ात ही फुलं परिपक्व होवून आपोपच गळायला लागतात. दररोज टोपली दोन टोपली फुलं वेचून गोळा करणे, ती घरात माळ्यावर वाळत घालणे ही कामे पूर्ण केली जातात. ज्या देठापासून फुलं गळून पडतात त्याच ठिकाणी हाताच्या अंगठय़ाच्या आकाराची फळं वाढायला सुरुवात होते. ही फळं घडाच्या स्वरुपात येतात व त्यांची वाढ साधारणपणे जूनमध्ये पूर्ण होते. त्याच सुमारास मान्सूनला सुरुवात झालेली असल्याने ही फळं अर्थात टोळंबीच्या बियांचा सडा मोह झाडाच्या खाली दिसतो. फुलांप्रमाणेच टोळंबीचं बी देखील वेचणे, गोळा करणे आणि पाडय़ावरील माळ्यावर सुरक्षित ठेवणे ही कामे आदिवासी करतात. टोळंबीच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा खाद्यतेल म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून निघालेली ढेप याचाही वापर जनावरांना खाद्य म्हणून वा साबण तयार करण्यासाठी होतो. टोळंबीप्रमाणेच साधारणत: वर्षांचे मोह झाड (तरु) असेल तर त्याच्या मुळ्यांचा अर्क माणूस वा जनावरांच्या डोळ्यातील फूल (टिका)काढण्यासाठी केला जातो. टोळंबीच्या तेलाचाही औषध म्हणून वापर केला जातो. आदिवासींमध्ये मोह फुलाला अन्नाचा दर्जा आहे. ही फुलं भाजल्यावर त्यापासून चटणी तयार केली जाते. त्यात अन्य कडधान्याचा वापर केल्यास पोषक आहार म्हणून त्याचा वापर होतो. थोडक्यात डोंगरदऱ्यातील आदिवासींसाठी पोटाची खळगी भरण्याचे एक प्रमुख साधन म्हणून मोहाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीचे कार्यकर्ते करणसिंग कोकणी यांनी दिली. तथापि, वर नमूद केलेल्या उपयोगांकडे सोयिस्कररित्या कानाडोळा करून मोहाच्या फुलाचा वापर हा केवळ अन् केवळ दारु गाळण्यासाठीच होतो, असा समज आदिवासी विकास खात्यामार्फत पसरविला जात आहे, असा आरोपही कोकणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

Sunday, November 22, 2009

आदिवासी विकास मंत्र्यांच्या अकलेचे दिवाळे- एकनाथ खडसे

लोकसत्ता २० नोव्हेम्बर

आदिवासी विकास मंत्र्यांच्या अकलेचे दिवाळे- एकनाथ खडसे

नाशिक, २० नोव्हेंबर / प्रतिनिधी
मोहाच्या दारू निर्मितीतून आदिवासींच्या विकासाच्या गोष्टी राज्याचे मंत्री करणार असतील तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले असेच म्हणावे लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. वारकरी पंथीय बबनराव पाचपुते हे वारकऱ्यांनाही हीच शिकवण देणार आहेत काय, असा सवालही त्यांनी येथे केला.
मागील आठवडय़ात वादळी पावसाने जिल्ह्य़ात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीकडून महात्मा गांधींच्या नावाने मते मागितली जातात. गांधींनी कधीही दारूचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी मोहाच्या दारूच्या माध्यमातून आदिवासी विकासाच्या गोष्टी करणे हे गैर आहे, असे खडसे यांनी सांगितले. जिल्ह्य़ात वादळी पावसाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून आपण मालेगाव, नांदगाव, पिंपळगाव बसवंत, पेठ, सुरगाणा येथील नुकसानीची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले. द्राक्ष उत्पादकांचा एकरी खर्च एक लाख रूपये धरल्यास त्यांना बसलेल्या दुहेरी फटक्याचा अंदाज येईल. शासनाने द्राक्ष उत्पादकांना ५० हजार रूपये हेक्टरी मदत करावी, त्यांना शंभर टक्के कर्जमाफी करावे तसेच त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी दीर्घ मुदतीवर व कमी व्याजदराने कर्ज द्यावे, डाळिंब बागांवर पडणाऱ्या रोगांसाठी शासनाकडून देण्यात येणारी मदत एकरी २० हजार रूपये करण्यात यावी, तसेच डाळिंब व द्राक्षांचा पीक विमा योजनेत समावेश करावा, अशा मागण्याही खडसे यांनी केल्या. मुंबईत आयबीएन-लोकमतच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून या हल्ल्याचे कदापि समर्थन होऊ शकत नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

नामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न

२० नोव्हेम्बर लोकसत्ता विशेष लेख

नामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न Print E-mail
शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
नामदार बबनराव पाचपुते
महाराष्ट्राचे नवीन आदिवासी विकासमंत्री झाल्यावर आपण आदिवासी भागातून ५० हजार टन मोहफुले गोळा करून त्याची दारू (‘हर्बल लिकर’) बनविण्याची मोठी योजना आखली असल्याची ठळक बातमी आहे. (लोकसत्ता, १६ नोव्हेंबर) यातून आदिवासींना व्यवसाय मिळेल असा आपला दावा आहे. गेल्या वर्षापासून आपण व आपल्या मागे गोळा झालेले काही राजकीय नेते या योजनेचा वारंवार उच्चार करीत आहात. आता तर प्रत्यक्ष आदिवासी विकास मंत्रीच झाल्यामुळे आपल्या हाती ही कल्पना राबवण्याची सत्ताही आली आहे. ही मोठी धोकादायक स्थिती आहे. महाराष्ट्राच्या व आदिवासींच्या वतीने आपल्यासमोर काही प्रश्न ठेवतो.
१. मोहापासून दारू बनविण्याची आदिवासींची पारंपरिक पद्धत आहे. ती अपुरी वाटली म्हणून तुम्ही आदिवासींना दारू पुरविण्याची ही नवी योजना मांडली आहे काय? दारू प्याल्यामुळे माणसाचा शारीरिक, बौद्धिक, आर्थिक व नैतिक विकास होतो का? मोहाची दारू ही आदिवासीची अत्यंत मोठी कमजोरी आहे हे सर्वज्ञात आहे. मोहापासून कारखान्यात दारू महोत्पादन होऊन ती बाजारात आल्यावर त्या दारूचा सर्वात मोठा गिऱ्हाईक व बळी आदिवासीच होणार नाही का? त्यामुळे त्याचे हित होईल की अहित? तुम्ही आदिवासींचा विकास करू इच्छिता की विनाश?
२. निवडून आल्याबरोबर व आदिवासी विकास मंत्री बनल्याबरोबर तुम्हाला आदिवासींची निरक्षरता, अंधश्रद्धा, गरीबी, दारूचे व्यसन, नक्षलवाद, कुपोषण, बालमृत्यू, भ्रष्टाचार, जंगलावरील अधिकार, आरोग्यसेवा व आश्रमशाळांची वाईट अवस्था, हे सर्व प्रश्न न दिसता दारू पुरवठा हीच प्रश्नथमिकता का वाटली?
३. तुमच्या सोबत महाराष्ट्रातील ‘मोह-गँग’चे अन्य लाभार्थी कोण? या ‘मोह-लूट’ योजनेचे लोणी ते आपसात कसे वाटणार याचा प्लॅनही महाराष्ट्राला सांगावा. उसापासून देशी दारू, द्राक्षांपासून वाईन व आता मोहफुलांपासून कायदेशीररीत्या आदिवासीसाठी स्पेशल दारू असल्या योजना तुम्हा नेत्यांना का सुचतात?
४. मोहफुले हा आदिवासींचा खाद्यपदार्थ व पूरक-आहार आहे. तो विकत घेऊन त्या ऐवजी पुरुषाच्या हातात रोख रक्कम दिल्यावर त्या रकमेचा उपयोग कुटुंबातील स्त्री व मुलांना अन्न-वस्त्रासाठी होईल की दारू पिणे व जुगार यावर उडवला जाईल?
५. मोहापासून दारूमुळे आदिवासी भागातील कुपोषण व बालमृत्यूंचे प्रमाण वाढेल ते कसे थांबवाल?
६. कापसासारख्या नगदी पिकाचा शेतकरी कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करतो हा विदर्भाचा प्रश्न ताजा असताना तुम्ही मोहफुलांना नगदी पीक बनवून आदिवासींना आत्महत्यांसाठी प्रेरित करू इच्छिता का?
७. मोह-लूट योजनेमुळे आदिवासी भागांमध्ये व्यसन, गुन्हे, गरीबी, कुपोषण व आत्महत्या वाढल्यावर त्यासाठी उपाय म्हणून एखादे सबसिडींचे पॅकेज केव्हा जाहीर करणार? त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेवर कोणता नवीन कर लावणार? त्या रकमेत पुन्हा कोणाचा वाटा किती राहणार?
८. आदिवासींच्या हितांचे व परंपरांचे संरक्षण करणे ही शासनाची संवैधानिक जबाबदारी आहे. तिला तिलांजली देऊन तुम्ही संवैधानिकरित्या शासकीय मंत्री कसे राहू शकाल?
९. ‘कारखान्यात निर्मित दारू विकत मिळाल्यास आदिवासी त्याला बळी पडतात म्हणून भारतातील आदिवासी भागात दारूची विक्री करू नये, असलेली दुकाने बंद करावी व पारंपरिक दारू लोकशिक्षणाद्वारे क्रमश: कमी करावी’ अशी भारत सरकारची अधिकृत ‘आदिवासी भागांसाठी मद्यनीती’ स्व. इंदिरा गांधींनी बनवून घेतली आहे (१९७६). ती महाराष्ट्राने अधिकृतरित्या स्वीकारली आहे (१९७७). हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ही शासकीय नीती विसरलात का? स्व. शंकरराव चव्हाणांनी स्वीकारलेली ‘आदिवासी विभागांसाठी मद्यनीती’ (१९७७) आता अशोकराव चव्हाणांच्या राज्यकाळात उलटी होणार का?
१०. या पूर्वी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व डॉ. अभय व राणी बंग यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना या प्रस्तावित कल्पनेबाबत पाठवलेल्या पत्रांच्या उत्तरात ‘शासनाचा असा कोणताच प्रस्ताव नाही.’’ असे अधिकृत उत्तर आलेले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे हे पत्र व आपण प्रस्तावित योजना यात विसंगती आहे.
११. आदिवासींची गरीबी व अविकास यातून तिथे नक्षलवाद फोफावला. तुमच्या या मोह-लूट योजनेमुळे आदिवासींची लूट वाढणार. त्यामुळे नक्षलवाद वाढणार नाही का?
‘महाराष्ट्र शासनापेक्षा आम्ही आदिवासींच्या हिताचे खरे रक्षक आहोत’ असा दावा नक्षलवाद्यांनी केल्यावर तुम्ही तो कसा खोडून काढणार? तुमच्या मोह-लूट योजनेतील भागीदार व एजंट नेते सोडल्यास कोणते आदिवासी तुमच्यावर विश्वास ठेवणार?
नक्षलवाद्यांनी पूर्वी दारूविरुद्ध कर्यक्रम आंध्र प्रदेशात घेतले आहेत. तुमच्या प्रस्तावित मोह-लूट योजनेला त्यांनी विरोध केल्यास नैतिक विजय कोणाचा होईल? तुम्ही नक्षलवाद्यांना नवीन मुद्दा व कार्यक्रम का पुरवू इच्छिता?
आपण या घातक कल्पनेला पुढे नेण्याऐवजी आदिवासी, कार्यकर्ते व आमच्यासोबत प्रथम चर्चा करावी असे आम्ही आपल्याला आवाहन करतो.
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अण्णा हजारे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, देवाजी तोफा.

Monday, November 16, 2009

हर्बल लिकरचा साक्षात्कार आदिवासींचा पूरक आहार हिरावणारा

दैनिक लोकसत्ता मधील बातमी

हर्बल लिकरचा साक्षात्कार आदिवासींचा पूरक आहार हिरावणारा
ह.भ.प. पाचपुतेंच्या ‘मोहा’ वर समाजसेवकांची टीका
चंद्रपूर, १६ नोव्हेंबर/प्रतिनिधी
राज्य निर्मिती होऊन पन्नास वष्रे लोटली तरी आदिवासींना त्यांच्या मुलभूत गरजा पुरवू न शकलेल्या राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा आदिवासींना लुटण्याचा 'मोह' जडला आहे. गेली पाच वष्रे वन खात्याची वारीच्या नावाखाली पुरती धुळधाण उडवल्यानंतर आदिवासी विकास खात्याचे मंत्री बबनराव पाचपुते यांना झालेला हर्बल लिकरचा साक्षात्कार आदिवासींचा पुरक आहार हिरावून घेणारा आहे, अशी टीका या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी केली आहे.
आपण पंढरीचे वारकरी आहोत, असे सांगणाऱ्या पाचपुतेंना वन खात्याचे मंत्री म्हणून काम करतांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोह जडला होता. यातून झालेल्या उलाढालीने अनेकांचे डोळे दिपून गेले होते. याच खात्यात असतांना त्यांची नजर जंगलात आढळणाऱ्या मोह फुलांवर गेली होती. तेव्हाच त्यांनी मोहापासून दारू तयार करण्याची कल्पना वनाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवली होती. हे काम खात्याचे नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगून पाहिले पण, पाचपुते हटायला तयार नव्हते. आता साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्याकडे अजूनही गरीब व अशिक्षित असलेल्या राज्यातील नऊ टक्के आदिवासींचा विकास साधण्याचे काम आले आहे. हा विकास फक्त दारू निर्मिती करूनच होऊ शकतो, असा साक्षात्कार पाचपुतेंना झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाचपुतेंच्या या विधानावर आदिवासी भागात काम करणाऱ्या समाजसेवकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
गडचिरोलीत सर्चच्या माध्यमातून काम करणारे प्रसिध्द ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी हा हर्बल वाईनचा प्रकार आदिवासींना लुटण्याचा नवा मार्ग आहे, अशी टीका बोलतांना केली. जंगलात मिळणारे मोहफुल हे आदिवासींच्या आहाराचे साधन आहे. आदिवासी मोहाचा वापर पुरक आहार म्हणून करतात. आता तोच मोह जर दारू निर्मितीसाठी सरकार वापरणार असेल तर आदिवासींच्या तोंडचा घासच आपण हिरावून घेत आहोत, याची जाणीव पाचपुतेंना तरी आहे काय, असा संतप्त सवाल डॉ. बंग यांनी उपस्थित केला. राज्याची निर्मिती होऊन पन्नास वष्रे झाली तरी आदिवासी जिथल्या तिथेच आहे. कोटय़वधी रुपये खर्चूनही त्यांच्या साध्या प्राथमिक गरजा सरकार पूर्ण करू शकले नाही. आता हे दारूचे आमिष दाखवले जात आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विकास म्हणजे साखर कारखानदारी, त्यातून तयार होणारी देशी दारू, हेच तत्व अवगत आहे. नेमका तोच प्रकार पाचपुते यांनी आदिवासींच्या बाबतीत सुरू केला आहे. केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी आदिवासींना मोहात पाडण्याचा हा प्रकार अतिशय घातक आहे, असे ते म्हणाले. आज आदिवासींना मोहाची दारू गाळण्याची परवानगी आहे. ही पध्दत कितीही तंत्रशुध्द केली तरी या दारूचा वास इतरांना सहन होणे शक्य नाही, अशा स्थितीत सरकार ही दारू बाहेर विकू शकणार नाही. मग हीच दारू आदिवासींनी दहा पट जास्त दराने बाजारातून विकत घेऊन प्यावी, अशी पाचपुतेंची अपेक्षा आहे काय, असा संतप्त सवाल डॉ. बंग यांनी उपस्थित केला. मागेही याच महोदयांनी हा मुद्दा मांडला होता. तेव्हा न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, शांताराम पोटदुखे यांना सोबत घेऊन २५ हजार आदिवासींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मोहापासून दारू बनवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही, असे उत्तर दिले. तरीही पाचपुते तोच राग आळवत असतील तर ते मुख्यमंत्र्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असेच म्हणावे लागेल, असे डॉ. बंग म्हणाले. गेल्या तीस वर्षांंपासून आदिवासी भागात काम करणारे मोहन हिराबाई हिरालाल यांनीही पाचपुतेंची ही भूमिका आदिवासींना आणखी नागवणारी आहे, अशी टीका आज बोलतांना केली.

हा तर आदिवासी ‘डुबाव’ कार्यक्रम !

दैनिक लोकसत्ता मधील बातमी -

हा तर आदिवासी ‘डुबाव’ कार्यक्रम !
पाचपुतेंच्या सहकाऱ्यांमध्येच नाराजीचा सूर

नाशिक, १६ नोव्हेंबर / विशेष प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री ह.भ.प. बबनराव पाचपुते यांनी मोहाच्या फुलापासून बनविल्या जाणाऱ्या दारुला ‘हर्बल लीकर’चा दर्जा बहाल करीत तिचे शासकीय थाटात ‘प्रमोशन’ करण्याचा विचार व्यक्त केल्यावर मंत्रिमंडळातील त्यांच्याच सहकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ज्या दारुने आदिवासींचा ऱ्हास झाला, त्यापायी शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झालीत, दारुडय़ा नवऱ्यांकडून महिलांना मारहाण होण्याच्या वा खुनाच्या असंख्य घटना घडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर किर्तनकार बुवांनी समाजाला दारु सोडण्याचा संदेश देणे अभिप्रेत असताना त्याच महोदयांकरवी दारुचे उदात्तीकरण होणार असेल तर हे कसले आदिवासी विकास खाते, हे तर निव्वळ आदिवासी ‘डुबाव’ खाते आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
आदिवासी समाज अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा अन् अज्ञानामुळे पिढय़ान्पिढय़ा अज्ञानाच्या खाईत लोटला गेला आहे. हा समाज नेहमीच उपेक्षित राहिल्याने त्याची अनेकविध कारणांनी पिळवणूक होत आली आहे. केंद्र व राज्य सरकारकरवी अलीकडे राबविण्यात येणाऱ्या आदिवासी उत्थानाच्या काही योजनांच्या परिणामी तसेच सेवाभावी संस्था, संघटना अन् विविध पक्ष कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे आदिवासीबहुल पट्टय़ात प्रबोधनाच्या कामाला चालना मिळू शकली. त्याचाच एक भाग म्हणजे आदिवासी पट्टय़ाशी संबंधीत किमान चार विभागातील बहुसंख्य महिलांनी दारु बंदीची एकमुखी मागणी सरकारकडे केली. त्याचा गांभिर्याने विचार होण्याऐवजी ‘हर्बल लीकर’च्या नावाखाली दारुच्या प्रचार-प्रसाराला चालना देण्याची मंत्र्यांची कृती निश्चितच चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया जनार्थ आदिवासी विकास संस्थेच्या रंजना कान्हेरे यांनी व्यक्त केली. मोहाच्या फुलाला वा त्यापासून तयार होणाऱ्या दारुला आदिवासींमध्ये सांस्कृतिक, धार्मिकस्थान असले तरी तो तेवढय़ापुरताच मर्यादित राहावा, त्याला शासनमान्यता मिळू नये असेही मत त्यांनी व्यक्त केले.
वन खात्याचे मंत्री असताना बबनराव पाचपुते यांनी पवन ऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात वन जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्वाधीन केल्या. आता त्यांच्याकडे आदिवासी विकास खाते आल्यानंतर आदिवासींच्या हक्काची जंगल संपत्ती अर्थात मोहाची फुलं देखील दारु उत्पादीत करण्याच्या निमित्ताने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात देण्याच्या कटाचा हा एक भाग असल्याचा आरोप सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले यांनी केला.
वास्तविक पाहता आदिवासी वन हक्क कायदा २००६ अस्तित्वात आल्यावर जंगल संपत्ती आदिवासींपासून हिरावून घेण्याची कोणतीही कृती आदिवासींवर अन्याय करणारी आहे. जंगलातील मोहाच्या झाडाची फुलं गोळा करण्यासाठी यापूर्वी वनखात्याच्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांची परवानगी लागत होती. त्यातूनच मग वनखात्याच्या अधिकाऱ्यांना खंडणी देण्याची पद्धत रुढ झाली आणि मोहाच्या दारु सोबतच कोंबडी देणे ही सहज बाब होत गेली. मोहाची दारु ही आदिवासींची पूर्णत: खासगी अन् धार्मिक बाब म्हणून ओळखली जाते. साधारणपणे आदिवासी बांधव पारंपरिक सण वा उत्सवासाठी, देवादिकाला नेवैद्य देण्यासाठी, लग्न समारंभ वा सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता मोहाच्या फुलापासून निर्भेळ दारु गाळत असतो. तीही मर्यादित असते. वनखात्याने यापूर्वीच जंगल संपत्तीतील बांबूच्या बाबत कटू निर्णय घेतला आहे. आता मोहाच्या फुलाबाबतही असाच निर्णय होणार असेल तर राज्य सरकारचे धोरण हे निसर्ग संपत्तीची ओरबाड करणारे असून त्यामुळे आदिवासींचा जीवनस्तर वा आर्थिकस्तर उंचावण्याऐवजी त्यांना खड्डय़ात घालण्याचाच हा एक कुटील डाव आहे. खरं तर आदिवासी खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या मंत्र्यांकरवी आदिवासींच्या विकासाचा अग्रक्रमाने विचार होणे अगत्याचे असताना या उलट अशापद्धतीचे निर्णय घेवून आदिवासी ‘डुबाव’ यासारखा कार्यक्रम राबविला जात असल्याची टिकाही ढमाले यांनी केली.

ह.भ.प. बबनरावांना ‘मोह’ अनावर !

दि. १६ नोव्हेंबर २००९ च्या लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेली बातमी

नाशिक, १५ नोव्हेंबर / विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् कीर्तनकार ह.भ.प. बबनराव पाचपुते यांनी आदिवासी विकास खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर शंभर दिवसाच्या ‘टारगेट’मध्ये अगदी सुरुवातीलाच ‘मोह’ अनावर झाला अन् उसाच्या कंट्री लिकरपेक्षा मोहाच्या फुलापासून तयार केल्या जाणाऱ्या दारूला ‘हर्बल लिकर’ म्हणून बाजारात आणण्याचा निर्णय घेवून टाकला आहे. तसा मनोदय या महोदयांनी नाशिक मुक्कामी अलीकडेच व्यक्त केल्यामुळे आता द्राक्ष वाइनरींच्या धर्तीवर आदिवासी भागातही ठिकठिकाणी मोहाची दारु उत्पादीत करणारे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात सुरु होऊ शकतील अशी चिन्हे आहेत.
मोहाच्या फुलापासून मद्यनिर्मितीची प्रक्रिया आदिवासीबहुल पट्टय़ातील वाडय़ापाडय़ावर पूर्वीपासून केली जाते. आदिवासी पारंपरिकतेचे एक अंग म्हणूनही त्याकडे पाहिले गेले. आयुर्वेदामध्येही या फुलाला स्थान आहे. तथापि, हा विषय अनादीकालापासून दुर्लक्षित राहिला. मोहाच्या फुलापासून दारु गाळण्याला शासन मान्यता दिली तर हाच व्यवसाय पुढे हर्बल लिकर म्हणून नावारुपास येऊ शकतो. परिणामी आदिवासींना एक हक्काचा आर्थिकस्त्रोत उपलब्ध होऊ शकेल. त्यातूनच मग त्यांच्या राहणीमानाचा स्तरही उंचावेल अशी बबनरावांची धारणा आहे. आजघडीला राज्यातील जंगलात ४ कोटी ३५ लाख मोहाची झाडे आहेत. हा व्यवसाय अतिशय शास्त्रशुद्धरितीने व्हावा म्हणून प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार आदिवासींना ही फुले वेचता यावीत, त्याची साफसफाई व्यवस्थित करता यावी म्हणून व्यापक प्रमाणात नेट (जाळी) वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही बबनरावांनी जाहीर केले. उसाच्या मळीपासून मद्यनिर्मिती, द्राक्षांपासून वाइन, बियांपासून ऑईल निर्मिती याच धर्तीवर मोहाच्या फुलापासून ‘हर्बल लिकर’ची निर्मिती असा हा उद्योग असल्याचेही ते सांगण्यास विसरले नाहीत.
पक्ष नेत्यांनी बबनरावांनावर टाकलेली आदिवासी विकास खात्याची जबाबदारी त्यांनी नाखुषीनेच स्वीकारल्याचे एव्हाना प्रश्नरंभीच उघड झाले होते. परंतु गेल्या मंत्रिमंडळात वन खात्याचा कारभार हाकताना त्यांचा जंगलातील आदिवासी समाज अन् पर्यायाने याच जंगलात वाढणाऱ्या मोहाच्या झाडांचाही जवळून संबंध आला असणार. ज्या आदिवासी नेत्यांनी आजवर या खात्याची धुरा वाहिली, त्यापैकी जवळपास कोणीच मोहाच्या झाडांची संख्या किती, त्यापासून किती फुले पडतात, त्या फुलांपासून किती दारु गाळली जाऊ शकते, झाडाच्या बुंद्याचा घेर किती असला म्हणजे त्यावर फुलांचे प्रमाण कसे असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उकळून तयार होणारी लिकर अन् सडून तयार केलेली वाइन यातील फरक या अगदी बारीकसारीक मुद्यांचा उहापोह एवढा जाहीरपणे केल्याचे ऐकिवात नाही. पण, कीर्तनकार बबनरावांनी मोहाची तपशीलवार माहिती खात्याचा कारभार सांभाळण्याआधीच करून घेतल्याचे त्यांच्या कथनावरून स्पष्ट होते. साधारणपणे मद्यपी वर्गामध्ये खंबा, बाटली, चपटी हे शब्दप्रयोग सर्रास ऐकावयास मिळतात. एका खंब्यात साडे सातशे मिलिलीटर, चपटीमध्ये किती याप्रमाणे एक किलो मोह फुलापासून साधारणत: साडे तीनशे मिलिलीटर दारु पडू शकते अन् त्यात पाणी घातले की हेच प्रमाण खंब्यापर्यंत जावू शकते हा सारा हिशेबही बबनरावांनी अत्यंत मनमोकळेपणाने मांडून टाकला. बबनरावांनी एवढय़ा सगळ्या गोष्टींवर एखाद्या जाणकाराप्रमाणे भाष्य केले. पण, आपण अन् आपले कुटुंबीय वारकरी वा माळकरी असल्यामुळे त्याच्याशी आपला दुरान्वयानेही संबंध येत नाही. राजकारणात इतकी वर्षे राहून देखील आपला दारु, सिगारेट, बिडी ना काडी याला हात लावला नाही. त्यामुळे धरलीच नाही, तर सोडणार कुठे, अशी कबुलीही ते बोलण्याच्या ओघात हसत हसत देते झाले.